माझा कट्टा | प्रतिनिधी
– राजकीय अनैतिक संबंधातून बाजार समितीच्या निवडणुकीत विरोधकांनी अभद्र युती केली, मात्र विधानसभेच्या निवडणुकीपासून हे दोघे एकत्र होते. दोघे एकत्र होवून लढले तरी विजय आमचाच होणार आहे. केवळ विरोधाला विरोध करण्यासाठी आजी-माजी आमदार अभद्र युती करून निवडणुक लढवत आहेत. सत्तेच्या जोरावर खाजगी बाजार समिती स्थापन करणाऱ्यांना या निवडणुकीत मत मागण्याचा अधिकार नसल्याचा टोला अमरसिंह पंडित यांनी लगावला. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुक पार्श्वभुमीवर त्यांनी पत्रकार परिषद घेवून विरोधकांवर हल्लाबोल केला.
गेवराई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरस्कृत स्वाभिमानी शेतकरी विकास आघाडीने जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली प्रचारात आघाडी घेतली आहे. बैठकांच्या माध्यमातून त्यांनी थेट मतदारांशी सुसंवाद साधून उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले आहे. अमरसिंह पंडित यांनी पत्रकार परिषद घेवून स्वाभिमानी शेतकरी विकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांची घोषणा केली. यावेळी त्यांनी भाजपा आ.लक्ष्मण पवार आणि माजी आ.बदामराव पंडित यांचे नाव न घेता त्यांच्यावर टिका केली. पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, जयभवानी सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष जगन्नाथ शिंदे, सभापती जगनपाटील काळे, माजी सभापती कुमारराव ढाकणे यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी विकास आघाडीचे उमेदवार अशोक नाईकवाडे, रामलाल धस, महारुद्र चाळक, हनुमान कोकणे, मुजीब पठाण, बाबासाहेब जाधव, पांडुरंग मुळे, सौ.वैशाली बाबुराव जाधव, श्रीमती लक्ष्मीबाई नारायण पवार, विकास सानप, रमेश साखरे, अशोक खरात, रमेश खोपडे, मंगेश कांबळे, जगन्नाथ काळे, राम चाळक, दिलीपकुमार जैन यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
बाजार समितीच्या निवडणुकीत स्वच्छ प्रतिमेचे व सर्वसामान्य शेतकरी कुटूंबातील कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली असून त्यांना विजयी करण्याचे आवाहन अमरसिंह पंडित यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, सत्तेचा वापर खाजगी धंदे उभारण्यासाठी आम्ही कधीच केला नाही, मात्र या मंडळींनी खाजगी बाजार समिती काढून स्वतःची तुंबडी भरण्याचे काम केले. निवडणुकीत प्रचार करण्यापूर्वी खाजगी बाजार समितीचा हिशोब सुध्दा लोकांना द्या असेही त्यांनी सांगितले. ‘आंखोही आंखो में इशारा हो गया’ याप्रमाणे दोघांची आपसात युती झाली, हे दोघेही आजी-माजी आमदार एकच असून केवळ लोकांना दाखविण्यासाठी एकमेकांवर चिखलफेक करत असतात. स्वतःला फार स्वच्छ प्रतिमेचे समजणारे आणि सातत्याने पंडितांवर टिका करणाऱ्यांनी आता युती कशी केली ? हे लोकांना सांगितले पाहिजे.
गेवराई कृषी उत्पन्न बाजार समितीने केलेल्या विकास कामांची माहिती पत्रकार परिषदेत देवून अमरसिंह पंडित यांनी स्वाभिमानी शेतकरी विकास आघाडीच्या उमेदवारांना मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन केले. सर्व उमेदवारांचा त्यांनी यावेळी परिचय करून दिला.
Comments