माझा कट्टा | प्रतिनिधी
– एकीकडे राज्यातील तापमानाचा पारा चढत असतांना दुसरीकडे राजकीय तापमानाचा पारा देखील वाढत असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. सध्या राजकारणात अतिशय वेगाने घटना आणि घडामोडी घडणं सुरू झालं आहे. त्यामुळे राजकारण चांगलंच तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून जोर धरत आहेत.
तर आता अजित पवार यांना पक्षातील बहुतांश आमदारांचा देखील पाठिंबा असल्याच्या चर्चा आहेत. त्यातच आता अजित पवार यांनी त्यांच्या सोशल मीडियावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यासोबत असलेले फोटो हटविला आहे. त्यावर आता सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे..
मी अजित दादा यांचे ट्विटर पाहिलेले नाही. मी तपासून सांगते, 40 आमदार कशाबद्दल नाराज आहेत ? हे सगळं अगदीच काल्पनिक आहे. मी आणि जयंतराव 24 तास तुमच्यासाठी उपलब्ध असतो. त्यामुळे मला असं काही ही कळले नाही. 40 लोकं कोण नाराज आहेत, त्यांच्याशी मी नक्कीच चर्चा करणार असून अजित दादा माध्यमांशी कमी बोलत असतात , असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
कुठल्या ही चर्चेबाबत मी सध्या सांगू शकत नाही. मी बारामतीत शेतकरी यांचे प्रश्न असतील ते पाहायला गेले होते. 15 मिनटात मी अजित पवार यांचे ट्विटर आणि फेसबुक चेक करून सांगते, असे देखील सुप्रिया सुळे यांनी सांगितलं आहे.
अजित पवार यांनी त्यांच्या ट्विटर आणि फेसबुकवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव, चिन्ह आणि शरद पवार यांच्यासह फोटो असलेले बॅनर हटविला आहे. ते फोटो त्यांनी कायमस्वरूपी डिलिट केले आहे. त्यामुळे अजित पवार यांनी हा इशारा दिला आहे का ? अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे.
गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे कोणत्याही क्षणी महाविकास आघाडीतून बाहेर पडतील अशा चर्चा सुरू होती. त्या पार्श्वभूमीवर एका वृत्तपत्राने अजित पवार हे 40 आमदारांसोबत भाजपासोबत जाऊन सरकार स्थापन करतील, चर्चा सुरू आहे. त्यामध्ये सुप्रीम कोर्टाकडून सत्तासंघर्षाचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे भाजपकडून बी प्लॅन तयार केला जात असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान यामुळं राज्याच्या राजकारणात हवामानातील तापमानापेक्षा जास्तचं तापमान वाढले असल्याचं चित्र आहे. त्यामुळं आता पुढे काय होणार ? याकडं सर्वांचे लक्ष आहे..
Comments