माझा कट्टा | प्रतिनिधी
– बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा अवकाळीने कहर सुरू केलाय. सायंकाळनंतर सुरू झालेल्या वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटाने चार दुर्घटना घडल्या आहेत. यामध्ये विविध ठिकाणी वीज पडून 2 महिलांसह 3 बैल ठार झाले असून या दुर्दैवी घटना बीडच्या आष्टी तालुक्यात घडल्या आहेत. काजल विकास माळी वय 23 रा.केरुळ ता. आष्टी व राणी संदीपान सावंत वय 35 रा. सांगवी ता.आष्टी असं मयत महिलांची नावे आहेत. या दोन घटनेसह तिसरी घटना ही तालुक्यातील पारगाव येथे घडलीय. येथील शेतकरी युवराज नवनाथ भोराडे यांची बैलजोडी वीज पडून दगावली आहे. तर चौथी घटना ही शिरुर कासार तालुक्यातील भडखेल येथे घडलीय. येथील शेतकरी मधुकर आहेर यांचा एक बैल वीज पडुन दगावला आहे.
दरम्यान बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळीने कहर सुरू केलाय. जवळपास दीड महिन्यात सात ते आठ वेळा गारपीट झालीय. यामुळे शेतकरी पूर्णतः उध्वस्त होत असल्याचे चित्र पाहायला मिळतंय. अनेकांचे घर संसार उघड्यावर आले आहेत. यामुळं शेतकरी हवालदिल झालाय. मात्र आता पुन्हा एकदा अवकाळी सुरू झाल्याने आसमानी संकट जिल्ह्यावर घोंगावत असल्याचे चित्र निर्माण झालंय..
Comments