माझा कट्टा | प्रतिनिधी
– बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसासह गारपिटीने कहर केलाय. तर आज पुन्हा एकदा बीडच्या आष्टी तालुक्यात असणाऱ्या अरणविहीरा गावाला तुफान अवकाळी पावसासह गारपिटीने तडाखा दिलाय. यामध्ये शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालं असून फळबागा उध्वस्त झाल्या आहेत..
आष्टी तालुक्यातील अरणविहीरा गावासह अनेक भागाला जोरदार अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसला आहे. या पावसामुळे माणसाच्या गुडघ्या इतका गाराचा थर साचलेला सगळीकडे पाहायला मिळाला.यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून तात्काळ पंचनामे व्हावेत, अशी मागणी शेतकरी करत आहे.
बीड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सकाळी कडक ऊन,दुपारी ढग दाटून येत असून सायंकाळच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह तालुक्यातील कुठल्या ना कुठल्या भागात जोरदार पाऊस होऊन गारपीट होत आहे. मागील आठवड्यात झालेल्या अवकाळीने हवालदिल असलेला शेतकरी आणखीन संकटात सापडला असून आज सायंकाळी अरणविहिरा परिसरात झालेल्या या गारपिटीने शेतकऱ्यांच्या फळबागा व उन्हाळी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
दरम्यान अचानक झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे दौलावडगाव, पिंपळगाव घाट, देऊळगाव घाट, हरेवाडी, मराठवाडी येथील अनेक शेतकऱ्यांनी कांदा बियाण्यासाठी तयार केलेले गोट तसेच जनावरांसाठी खाद्य म्हणून तयार केलेले मका आणि कडवळ तसेच काही ठिकाणी डाळिंबाच्या बागांवर या गारपीटीमुळे फार मोठा परिणाम झालेला असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे.. या भागात हिमाचल प्रदेशात जशी बर्फ वृष्टी होती त्याप्रमाणे सगळीकडे गारपीट झालेली पाहायला मिळत होती. दरम्यान प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होता आहे.
पहा व्हिडिओ
Comments