माझा कट्टा | प्रतिनिधी
– बीडमध्ये बाजार समितीच्या निवडणुकीवरून क्षीरसागर काका पुतण्यात चांगलाचं राजकारण तापलं आहे. सत्ता हे टोल कलेक्शनचे माध्यम नाही. बीडीओच्या बाजूला खुर्चीत बसून टक्केवारी दिली तरचं फाईल काढा म्हणतात. मला विचारल्या शिवाय फेरफार करायचा नाही असं सांगतात. असा गंभीर आरोप करत काका जयदत्त क्षीरसागरांनी पुतण्या संदीप क्षीरसागरांवर सडकून निशाणा साधला. त्याचबरोबर बाजार समिती म्हणजे जुगार, गुटख्याचे अड्डे नाहीत. असं म्हणत भाजप जिल्हाध्यक्षांसह शिंदे गट शिवसेनाच्या जिल्हाप्रमुखावर देखील शरसंधान साधले.. ते बीडमध्ये बाजार समिती निवडनूकीच्या मतदार मेळाव्यात बोलत होते..
यावेळी ते म्हणाले, की सत्ता हे सेवेचे साधन आहे, सत्ता हे लाटायचं साधन नाही. सत्ता टोलकलेक्शनचं माध्यम नाही, टक्केवारी खायचं माध्यम नाही.. पण दुर्दैवाने तसं वाटतंय..सत्ता मिळाली म्हणजे परवाना मिळालाय, टक्केवारी गोळा करण्याचा अधिकार परवाना. अशा प्रकारचा समज दृढ होत असून दुर्दैवाने तुम्हाला हे पाहावं लागत आहे. सरकारने विहिरी, शेततळे, घरकुल दिलेत.मात्र माणूस ज्यावेस बीडीओकडे जातो, तेव्हा खुर्चीच्या बाजूला माणूस बसलेला असतो, अन तो म्हणतो टक्केवारी दिली तरचं फाईल काढा. त्याचबरोबर कुणी जमीन विकत घेतली बीडमध्ये तर फेरफार करायचा असेल तर मला विचारल्याशिवाय फेरफार करायचा नाही, असं म्हणतात. असा सणसणीत गंभीर आरोप काका जयदत्त क्षीरसागर यांनी पुतण्या संदीप क्षीरसागरांवर केलाय.
त्याचबरोबर बाजार समिती म्हणजे जुगार अन गुटखा अड्डा नाही. असं म्हणत जुगार अड्डा प्रकरणी ज्या भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्केंवर आणि गुटखा रॅकेट प्रकरणी शिंदे गट शिवसेना जिल्हाप्रमुखांवर गुन्हा दाखल झाला होता. त्यांच्यावर देखील सणसणीत निशाणा साधलाय.
दरम्यान समाजात लोकशाही आहे, प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे, कमावण्याचा अधिकार आहे. मात्र आता जे हे इथं मधी आलेत त्यांना समज द्यायची, त्यांना झटका द्यायची, ती ही निवडणूक आहे. 2023 साल हे निवडणुकीचे असून ही बाजार समितीची निवडणूक पाया आहे, पुढील निवडणुकीचा.. त्यामुळं अतिशय चांगल्या फरकाने आपलं पॅनल हे विजयी होणार आहे. असं म्हणत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांनी आपण जिंकणार हा विश्वास देखील व्यक्त केला..
Comments