माझा कट्टा | बीड
खंडणीसाठी कॉन्ट्रॅक्टरच्या मुलीचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना बीडच्या आष्टी शहरात उघडकीस आलीय. त्यामुळं जिल्ह्यात वाढत असणाऱ्या गुन्हेगारीमुळे कायदा सुव्यवस्था आहे का ? असा प्रश्न नागरीकांना पडत आहे. आष्टी शहरातील गुत्तेदाराकडून खंडणी वसूल करण्याच्या हेतूने, खंडणी बहाद्दरांनी त्यांच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून इंदापूर-भिगवन परिसरात डांबून ठेवले होते. यात पोलिसांनी कारवाई करत पिडित मुलीची सुटका केली असून खंडणीबहाद्दराच्या मुसक्या आवळल्या आहेत.
“मुलगी सुरक्षीत पाहिजे असेल तर 3 लाख घेवून ये”, असे फोन येत होते. त्यावर आष्टी पोलीस आणि सायबर विभाग यांनी तांत्रिक तपासाला वेग देत संबंधित आरोपी आणि पिडित मुलगी ही इंदापूर-भिगवन परिसरामध्ये असल्याची माहिती मिळाल्यानंतर, आष्टी पोलिसांनी या भागात सापळा रचला. तेव्हा खंडणी बहाद्दरांनी पिडित मुलीस डांबून ठेवल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. तेव्हा पोलिसांनी अत्यंत गोपनियतेनेआणि सावधपणे डांबून ठेवलेल्या ठिकाणावरून पिडित मुलीची सुटका करत तिला स्वत:च्या ताब्यात घेतले. तर याच दरम्यान संबंधित अपहरण कर्त्याच्याही पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
Comments